धोका साईबाबांचा !
मार्च महिन्यात दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक जी. एन. साईबाबा याला गडचिरोली सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्ष सुनावली. या प्राध्यापक महोदयांवर नक्षलवादाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आरोप होता. न्यायालयात तो सिध्द होऊन या पांढरपेशा नक्षलवाद्यास आता आपले उर्वरीत आयुष्य कारागृहात कथित क्रांतीची स्वप्न पाहत घालवावे लागणार आहे.
शिक्षा सुनावताना न्यायालयाने जे म्हटले आहे ते अतिशय महत्वाचे आहे, “प्राध्यापक साईबाबा हा नक्षलवादाचा प्रचार आणि प्रसार करीत असल्याचे न्यायालयात सिध्द झाले आहे. प्रा. साईबाबा 90 टक्के अपंग असला तरी त्याचा मेंदू पूर्णपणे कार्यरत असून तो माओवादी चळवळीमागील प्रेरणा असल्याचे सिध्द होते. 2008 पासून गडचिरोली जिल्ह्यात अनेक निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या बंदी घातलेल्या संघटनेचा नेता असल्याने तो जन्मठेपच नाही, तर त्यापेक्षा अधिक शिक्षेस पात्र आहे.”
पेशाने प्राध्यापक असलेल्या या व्यक्तीकडून नवीन पिढी घडवण्याचे काम होणे अपेक्षित असताना देशविघातक अशा नक्षल चळवळीत त्याचे असलेले सक्रीय योगदान हे विचारी जनांना नक्कीच काळजीत टाकणारे आहे. पिढी घडविणारी व्यक्तीच जर देशविघातक अशा कृत्यांना पाठींबा देत असेल तर नक्षलवादाविरोधी लढा किती तीव्र करण्याची वेळ आली आहे हे एव्हाना लक्षात आलेच असेल. शस्त्रधारी नक्षलवाद्यांसोबतच शहरी भागात राहणाऱ्या अशा अनेक पांढरपेशा साईबाबांविरोधात आज उभे राहण्याची वेळ आली आहे. अन्यथा संपुर्ण पिढीच ही मंडळी नासवतील हे नक्की.
देशात नक्षलवाद हा एक कळीचा मुद्दा आहे. नुकत्याच सुकमा येथे झालेल्या नक्षली हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले. देशाविरोधात युध्दा पुकारणाऱ्या, संविधानास न मानणाऱ्या डाव्या विचारांचे अपत्य असणाऱ्या नक्षलवादाचा सामना आज दुहेरी पध्दतीने करण्याची वेळ आली आहे. कारण सशस्त्र नक्षलवादासोबतच शहरी भागात नक्षलवादाने आपले बस्तान बसवले आहे. आपल्या नकळत.
नक्षलवाद म्हटलं की सर्वसामान्यपणे ‘रेड काॅरिडाॅर’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पशुपती ते तिरूपती या भागाचा विचार सर्वांच्या मनात येतो. नक्षलवाद साधारणपणे या पट्ट्यात असणाऱ्या राज्यांच्या जंगलप्रदेशात फोफावला असल्याचे चित्र आहे. मात्र चित्र अपुर्ण आहे. नक्षलवाद फक्त एवढ्याच भागापुरता मर्यादीत नाही. नक्षलवादाचे हे अपुर्ण चित्र पूर्ण होते ते शहरी भागात.
विविध पातळ्यांवर आज नक्षलवादी चळवळ काम करते आहे. त्यात त्यांचे वैचारिक पितृत्व येते ते डाव्या पक्षांकडे. त्यानंतर सशस्त्र नक्षलवादी आणि शहरात राहणारे, बुध्दीजीवी म्हणवणारे पांढरपेशे नक्षलसमर्थक.
सशस्त्र लढा देण्यासाठी देशाची संरक्षण दले हे समर्थ आहेत. मात्र शहरी नक्षलवादाचा सामना हा समाजातील विचारी आणि संविधान, लोकशाहीवर श्रध्दा असणाऱ्या जनांनाच करायचा आहे. शहरी नक्षलवाद हा सशस्त्र नक्षलवादाप्रमाणेच गंभीर आहे. किंबहुना त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे अराजकालाच निमंत्रण देणे आहे.
शहरी भागातील नक्षलसमर्थक हे सशस्त्र नक्षलवाद्यांप्रमाणेच धोकादायक आहेत. त्यात प्राध्यापक, वकील, डाॅक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी कार्यकर्ते आदींचा समावेश प्रामुख्याने होतो. ही मंडळी अगदी तुमच्याआमच्यासारखीच पांढऱपेशी. शिवाय यांचा व्यवसाय पाहता समाजात यांच्याबद्दल आदराचीच भावना जास्त असते. तेव्हा यांच्याबद्दल साधा संशयही कोणी घेत नाही. आणि याचाच फायदा ही नक्षलसमर्थक मंडळी घेत असतात. नक्षलवाद्यांच्या फ्रंट संघटना म्हणून ही मंडळी देशविघातक कृत्यांत भूमिका बजावत असतात.
हिंसक अशा नक्षलवादास नैतिक अधिष्ठान देण्याचे काम या मंडळींकडून होत असते. त्याचप्रमाणे चळवळीस मनुष्यबळ पुरवण्याचेही काम हे करतात. प्राध्यापक मंडळी हे काम अधिक कुशलतेने करतात. कारण यांचा संपर्क हा तरूण पिढीशी सर्वाधिक असतो. शिवाय प्राध्यापक असल्याने तरूणांना भावणाऱ्या भाषेत ब्रेनवाॅशिंग ही मंडळी अगदी सहजतेने करतात. त्यातूनच मग साईबाबासारखा जहाल नक्षलवादी प्राध्यापक तयार होतो. देशभर आज असे अनेक साईबाबा विविध महाविद्यालयांमध्ये आहेत आणि देशविघातक कृत्यांना पाठींबा देत आहेत, त्यात सक्रीय सहभाग घेत आहेत. त्यांचा पांढरपेशा बुरखा फाडायची वेळ आली आहे.
प्राध्यापकांसोबतच वकील, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, मानवाधिकारवादी असे अनेक ‘वादी’ मंडळी शहरी भागात नक्षलवादाचे उदात्तीकरण करत आहेत. ही मंडळी विविध मार्गांनी व्यवस्थेविरोधात चिथावणी देणे, हिंसेचे समर्थन करणे आदी कामं... करत असतात. हे करत असताना एक चलाखी ही मंडळी करतात, ती म्हणजे संविधान, लोकशाही, मानवतावाद, मानवाधिकार, शोषितांचा लढा, क्रांती अशा चारदोन नावांचा सातत्याने जप करणे. यामुळे त्यांची ‘लाल’कृत्ये ही झाकली जातात असा त्यांचा समज असतो. शिवाय ही मंडळी बऱ्याचदा सरकारी पदांवरही आपली वर्णी लावत असल्याने अनेक गोष्टी त्यांना सुखनैवपणे करता येणे शक्य होते.
शहरी नक्षलसमर्थकांचे मुख्य काम म्हणजे नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्याचे समर्थन करत संरक्षण दलांचे खच्चीकरण करणे. संरक्षण दलांनी नक्षलवाद्यांविरोधात कारवाई केली की ही मंडळी टाहो फोडतात. संरक्षण दले ही क्रूर असून निरागस, निष्पाप अशा नक्षलवाद्यांना ती विनाकारण लक्ष्य करत आहे, असा कांगावा सुरू करतात. मग देशभर विविध कार्यक्रम घेत ही मंडळी कंठशोष करत हिंडतात. त्यात त्यांना मदत करतात ती माध्यमांमधील काही मंडळी. मात्र नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हिंसेविरोधात ही मंडळी चकार शब्दही काढत नाहीत. तेव्हा यांना मानवाधिकाराचा विसर पडतो आणि ग्लासातल्या चमकदार पेयाचे घुटके घेत, वातानुकुलीत खोल्यांमध्ये बसून क्रांतीची स्वप्न रंगवण्यात हे रंगून जातात.
शोषितांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू झालेल्या नक्षल चळवळ आज पूर्णपणे भ्रष्ट झाली आहे. ज्या आदीवासींसाठी ही चळवळ सुरू केली होती, आज त्यांच्याच जीवावर ही मंडळी उठली आहेत. आदीवासींच्या समस्या सोडवण्यात व्यवस्थाही अपयशी ठरली आहे, यात दुमत नाही. मात्र व्यवस्थेकडून झालेल्या चुका सुधारण्यातही येत आहेत. मात्र नक्षलवाद्यांना नेमके तेच नको आहे. कारण व्यवस्था करत असलेले प्रयत्न यशस्वी झाले तर नक्षल चळवळ ही कालबाह्य ठरणार आहे.
शोषितांना न्याय मिळवून देणारे तत्वज्ञान म्हणून जगभरात उदोउदो होणाऱ्या साम्यवादी-डाव्या विचारांचे वैचारिक हिंसक अपत्य म्हणजे नक्षलवाद.
भारतीय संविधानास खरा धोका यांच मंडळींकडून आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ते अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले आहे, “कम्युनिस्टांचा संविधानाला विरोध आहे, तो संविधान कामगारांच्या अहिताचे आहे म्हणून नव्हे ! तर हे संविधान संसदीय लोकशाहीच्या आधारावर उभे आहे म्हणून. कम्युनिस्टांना भारतात प्रोलिट्रीएट लोकांची हुकुमशाही हवी आहे आणि या हुकुमशाहीला अनुसरून त्यांना संविधान हवे आहे. दुसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे डाव्यांना संविधानातील मुलभूत अधिकारांवर निर्बंध नको आहेत. जेणेकरून ते संसदीय मार्गांनी सत्तेवर येऊ शकले नाहीत तर या अनिर्बंध हक्कांचा वापर करून ते राज्य उलथून टाकू शकतील आणि भारतात हुकूमशाही आणू शकतील.” (संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे आणि लेखन, खंड- 17, पृष्ठ क्र. 406).
● पूर्वप्रसिद्धी: सहज सुचलेलं, ३०-४-२०१७, बहर- साहित्य पुरवणी, दै. आपला महाराष्ट्र, धुळे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा