राजधानीत रंगली दिवाळी पहाट !


सकाळी साडेपाच-सहाची वेळ, हिवाळ्याची नुकतीच चाहुल लागल्यामुळे वातावरणात असलेला सुखद गारवा, खास ठेवणीतला झब्बा, पायजमा, आणि पैठणी परिधान करून आलेली मंडळी, त्यावरच्या अत्तराच्या हलक्या शिडकाव्याने आसमंतात भरून गेलेला हलकासा गंध आणि सज्ज झालेला रंगमंच ! आता सुरू होणार अभिजात आणि सुरेल मराठी गाण्यांची मैफल......
हे वर्णन ‘दिवाळी पहाट’चे आहे, हे एव्हाना वाचकांच्या लक्षात आले असेलच. मात्र, ही ‘दिवाळी पहाट’ रंगली  ती राजधानी दिल्लीत, इंडिया गेटजवळ- राजपथावर ! 
 दिवाळी पहाट म्हणजे महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिवाळी पहाट अगदी उत्साहात साजरी करण्यात येते. अगदी त्याच उत्साहात राजधानी दिल्लीत दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे प्रतिष्ठानचे तिसरे वर्ष होते. या कार्यक्रमाचे स्थानही अगदी विशेष होते - इंडिया गेट ! इंडिया गेटची भव्यता सोबतीला असल्यामुळे कार्यक्रमाला वेगळीच उभारी प्राप्त झाली आणि दिवाळी पहाट अगदी बहारदारपणे साजरी झाली.
राजधानीत 2016 साली इंडिया गेटवर दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्यात आला, आणि त्याची चर्चा केवळ दिल्ली अथवा महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर अगदी देश-विदेशातही पोहोचली. त्या वर्षी शास्त्रीय गायक महेश काळे यांनी मैफल रंगविली. त्यानंतर 2017 साली राहुल देशपांडे, मधुरा दातार  आणि सुधीर गाडगीळ या त्रिकुटाने कार्यक्रमात रंग भरले. सुधीर गाडगीळ यांच्या खुमासदार निवेदनाने दिल्लीकर मराठी जन मंत्रमुग्ध झाले. तीच परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली. यंदाच्या वर्षी बेला आणि सावनी शेंडे या भगिनींनी शास्त्रीय आणि सुगम गायनाने दिवाळी पहाट रंगविली आणि त्यांच्या सोबतीला होते अभिजित खांडकेकर. अविनाश चंद्रचूड यांच्या संगीत दिग्दर्शनाने कार्यक्रमाला वेगळाच नजाकत प्राप्त झाली. ‘अलबेला सजन’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मला जाऊ द्या ना घरी’, ‘ने मजसी’ अशा विविध गाण्यांनी रसिक श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. बेला शेंडे यांनी गायलेल्या लावणीला तर रसिकांकडून मनसोक्त शिट्ट्या पडल्या.

सकाळी सहा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीस इंडिया गेटवर आदल्या दिवशी दुपारपासूनच प्रारंभ झाला. सुमारे साडेपाच ते सहा हजार लोक या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात, त्यामुळे कार्यक्रमात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून झटत होते. विशेष म्हणजे कार्यक्रमस्थळी स्वच्छतेस सर्वाधिक महत्व देण्यात आले, त्यामुळे कार्यक्रमानंतरही इंडिया गेटचा परिसर अतिशय स्वच्छ होता. विशेष म्हणजे कलाकारांसाठी व्हॅनिटी व्हॅनसह सर्व सुसज्ज व्यवस्थाही पुरविण्यात आली होती. राजधानी आणि राष्ट्रीय राजधानी परिसरातील मराठी जन या कार्यक्रमाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. कार्यक्रमास राजधानीतील राजकीय, सामाजिक, प्रशासन आणि अन्य नामवंत मराठी जन आवर्जून उपस्थित राहतात.


यंदाचे आकर्षण किल्ले !

दिवाळीमध्ये किल्ले बनविण्यात एक वेगळाच आनंद असतो. शाळेला सुटी लागली की लहान मुले किल्ले बनविण्याच्या तयारीत गर्क होऊन जातात. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या किल्ल्यांची प्रतिकृती बनविण्यात लहानांसह मोठेही अगदी हरवून जातात. ती परंपरा जतन व्हावी आणि दिल्लीतील भावी मराठी पिढीला त्याची ओळख व्हावी, यासाठी यंदाच्या वर्षी खास किल्ले बनविण्याचा उपक्रम कार्यक्रमस्थळी घेण्यात आला. त्यात पुढाकार घेतला कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांनी ! किल्ले बनविण्यात मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापुरहून मंडळी आली होती. मुलांसाठी रायगडाची प्रतिकृती नमूना म्हणून सादर करण्यात आली. तर अन्य एक प्रतिकृती मुलांनीच तयार केली. त्यासाठी लागणारी माती, किल्ल्यांची चित्रे आणि अन्य आवश्यक बाबी अगदी माफक दरात कार्यक्रमस्थळीच उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. किल्ला बनविण्यात बच्चेकंपनी अगदी रंगून गेली होती.


भव्य मराठमोळी रांगोळी


रांगोळी म्हणजे मराठी संस्कृतीचे खास वैशिष्ट्य. प्रत्येक मराठी घराच्या अंगणात दररोज अगदी छोटी का होईना, पण रांगोळी रेखाटली जातेच. दिवाळीत तर विविध प्रकारच्या रांगोळ्या डोळ्याचे पारणे फेडत असतात. इंडिया गेटवर कार्यक्रमाच्या प्रवेशाद्वारावरही दहा फूट व्यासाची भव्य रांगोळी रेखाटली होती, इंडिया गेटची भव्यता आणि सुंदर रांगोळी हे अगदी पाहण्यासारखे चित्र होते. इंजिनिअर असलेली मधुरिमा पटवारी ही तरुणी आणि तिचे साथीदारींनी ही भव्य रांगोळी साकारली. तिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली की, यंदाच्या वर्षी दहा फूट व्यासाच्या दोन पारंपरिक मराठी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या. संस्कार भारती प्रकारातील त्या रांगोळ्या असतील. ‘इन्क्रेडीबल इंडिया’ अथवा ‘अतुल्य भारत’ अशी खास थीम घेऊन यंदाच्या वर्षी रांगोळी रेखाटली आहे. राजधानीत खास मराठमोळी रांगोळी रेखाटताना वेगळाच आनंद मिळतो, यापूर्वीच्या दोन्ही दिवाळी पहाट कार्यक्रमांना भव्य रांगोळी रेखाटल्याचेही मधुरिमा पटवारी यांनी सांगितले.



सिल्क साड्या, पैठणी, नाशिकची मिसळ आणि बरंच काही...

कार्यक्रमस्थळी बनारसचे मोहम्मद कालिम हे बनारसी सिल्कच्या कापड्यांचा, त्याचप्रमाणे मराठमोळ्या पैठणीचादेखील स्टॉल लावण्यात आला होता. त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीतील मराठी खवय्यांसाठी  खास नाशिकची झणझणीत मिसळही होती. गाण्यासोबतच रसिकांच्या पोटपूजेचीही काळजी अगदी निगुतीने घेण्यात आली.



कार्यक्रमातला विशेष भाग म्हणजे उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मराठी जनांचा सत्कार. ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, समाजसेवक चंद्रशेखर गर्गे, दिवंगत समाजसेवक रा. मो. हेजिब आणि शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज या संस्थेचा विशेष गौरव करण्यात आला.

कोणत्याही कार्यक्रमाची आखणी करायची म्हणजे त्यासाठी सुयोग्य नियोजनाची आवश्यकता असते. दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या नियोजन समितीमधील सर्व सदस्यांनी अतिशय काटेकोरपणे कार्यक्रमाचे नियोजन केले होते. ही दिवाळी पहाट अनुभवण्यासाठी केवळ मराठीच नव्हे, तर अमराठी बांधवदेखील मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. एवढेच काय, पण विविध परदेशी दूतासावासातील परदेशी अधिकारीदेखील हा अनोखा सोहळा अनुभवण्यासाठी येतात. महाराष्ट्रातील मराठी परंपरा उत्तरेत, थेट देशाच्या राजधानीत जपण्याचा प्रयत्न दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे. यानिमित्ताने मराठी जनांना एकत्र करण्याचेही महत्वाचे काम याद्वारे साध्य होत आहे. त्यामुळे राजधानीतील दिवाळी पहाट ही प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी, असेच म्हणावे लागेल. 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता